नमस्कार,
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन…
महिला दिनानिमित्त मी सर्व माता-भगिनींना शुभेच्छा देतो. प्रत्येक भारतीय महिलेचा आजपर्यंतचा प्रवास हा उल्लेखनीय आहे.
थोडंसं मागे जाऊन आपण इतिहासात डोकावलं तर आपल्याला दिसतं की, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय स्त्रीला शिक्षण, भाषण स्वातंत्र्य आणि भावना व्यक्त करण्याचे सुद्धा स्वातंत्र्य नव्हते. या मुलभूत हक्कांपासून त्या वंचित होत्या. त्यावेळी सर्वप्रथम राजा राम मोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी घडवून आणलेल्या सामाजिक आणि आर्थिक प्रयत्नांतून स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. नंतरच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अविरत परिश्रम घेऊन महिलांपर्यंत शिक्षणाची तेजस्वी ज्योत पोचवली.
स्वातंत्र्यपूर्व काळातली परिस्थिती आता बदलली आहे. आज, महिलांना दर्जेदार शिक्षण, समानतेचा हक्क, नोकरीच्या उत्तम संधी आणि आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळत आहेत. आता सर्वच महिलांनी आपल्या हक्कांप्रती जागरुक राहण्याची आवश्यकता आहे.
2005 च्या महिला कायद्याने महिलांचं स्वातंत्र्य जपलं आहे. त्यांना योग्य ते संरक्षण दिले आहे. वडिलोपार्जित आणि लग्नानंतर पतीच्या मालमत्तेमधील हक्क मिळतो आहे. त्याशिवाय घटस्फोटानंतर सुद्धा मालमत्तेमध्ये वाटा मिळतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठेही काम करण्याचा आणि मानाने, सन्मानाने जगण्याचा हक्क हीं मिळतो.
आज आपण हे कधीच विसरता कामा नये की एक स्त्री ही प्रसंगी प्रेमळ अशी मदर तेरेसा होऊ शकते आणि त्याच वेळी दुसरीकडे तिच्या आप्त-स्वकीयांचे आणि देशाचे संरक्षण करण्यासाठी जिजाबाई आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई सारखीच महाकालीचा अवतार हीं होऊ शकते.जरी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा मागे ठेवून स्त्री पुढे सरकली असली तरीही संस्कृती आणि रीतीरीवाजाच्या सहाय्याने स्त्रीने आता आपली पावले या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी भक्कमपणे रोवली आहेत हे निश्चित !
आजच्या या ‘स्त्रीत्वाला’ तिच्या सर्वोत्तम स्थान पटकावण्याच्या आणि समाजाच्या जडण घडणीमध्ये हातभार लावण्याच्या अभूतपूर्व कामासाठी मी मनापासून वंदन करतो.
आणि अजून असे अनेक मैलाचे दगड या स्त्रीने असेच पादाक्रांत करावेत या साठी आज महिला दिनाच्या निमित्ताने मी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
जय महाराष्ट्र !
आर.आर.पाटील,
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य